Tuesday 26 April 2016

तिच्या जन्माचा मृत्यू...

स्थळ दवाखान्यातील , एक लहान ५-६ वर्षांची मुलगी बोलते "नाही . . . मला नाही बोलायचं तिच्याशी ,पप्पा  मला म्हणाले भाऊ येईल ,मला भाऊच हवाय ."एव्हढी  लहान मुलगी  इतकं सारं  कसे बिनधास्तपणे बोलून गेली ? जणूकाही तिचे आई -वडील बाजारात खेळणी आणण्यास गेलेत अन तिला न आवडणारी खेळणी त्यांनी उचलून आणली , तर ती परत करायला लावतेय. खरे तर तेथील प्रत्येकाचाच चेहरा जवळपास तसाच होता , फक्त काय तर ती चिमुकली निरागसपणे व्यक्त करत होती आणि मोठयांना मात्र डोळ्यांच्या कोपर्यात आसवे लपवावी लागत होती. 
                     सर्वसाधारण कुटुंबातील हा सध्याच्या दिवसांत हमखास दिसणारा प्रसंग. भारत सरकारने 'गर्भलिंग ' परीक्षणावर बंदी आणल्यामुळे अशा प्रकारचे कुटुंबांचे हिरमोड बरेचदा व्हायला लागलेत . भले कितीही शिकलेली माणसे असो, त्यांचा हट्ट हा मुलासाठीच (का तर म्हणे वंशाला दिवा हवा .अन पुढे तोच दिवा वृद्धाश्रमात हाकलून लावतो तेव्हा चूक उमगते. ). मुलगा कि मुलगी ते आता आधीच बघता येणे शक्य नाही, मग फक्त मुलाचा हव्यास धरायचा अन जर मुलगी झाली तर आईला दोष द्यायला सारे मोकळे. (अन तो कायदा येण्याअगोदर मातृत्वाची काय हालत होती त्याबद्दल न बोललेलंच बरं .)त्याप्रसंगी त्या माउलीची काय चूक किंवा त्या इवल्याश्या जीवाने काय पाप केलं  होतं म्हणून त्याचा इतका तिरस्कार ? जिने नऊ महिने त्रास सहन केला , एक जीव पोटात सांभाळला , तिच्या तब्येतीची कोणीही विचारपूस करणारा नव्हता. ती तर फक्त एक यंत्र आहे ना  त्यांच्यासाठी ,मुले जन्माला घालणारी . मुलगा नाही झाला म्हणजे वरून बोलायचं यंत्रच बिघडलंय.
                  ती लहानगी , अवघ्या काही तासांची ,कुठल्या परिस्थितीतून जात होती याची तिला जाणीवदेखील नव्हती . ती तर आता कुठे श्वास घ्यायला शिकली अन तिचा जन्मोत्सव असा रडून साजरा होतोय ? स्वार्थामुळे आंधळे झालेल्या मानवाला इतके देखील न कळावे कि 'ती ' होती म्हणून त्याचा जन्म झाला , अन 'ती' असेल तरच मानवाच्या पुढच्या पिढी जन्माला येऊ शकतील. जन्माला आलेली 'ती ' ,तिलापण तर जगायचा अधिकार आहे. हे जग तिलादेखील बघायचंय. आपण तिचा हक्क हिरावणारे कोण ?
                   खरेतर तिच्या जन्माचा सोहळा करायला हवा , उत्सव आहे तो. तिला आनंदाने येउद्यात , मग बघा ती कसा आनंद पसरवते. तिलापण खेळू द्या , बागडू द्या , ती तुमच्या अंगणात सुखाचे झाड लावेल. खूप काही लिहायचे आहे , हा विषयच तसा गंभीर होत चाललाय. त्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे कारण फक्त एक व्यक्ती हा बदल नाही घडवू शकत. मागच्या पिढीच्या लोकांना 'ती'चे महत्त्व नाही कळलेले पूर्णपणे म्हणूनच तिच्या जन्माचा मृत्यू झाला. पण आता जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे ,'ती'ला गमावता कामा नये .


येतेय जन्माला कन्यारत्न ,तिला येऊ द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या .

कळी आहे ती झाडाची , तिला फुलू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या.  

आनंद पसरवेल ती , तिला बहरू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

इतरांप्रमाणेच बघायचे जग , तिला बघू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

फुलपाखरांप्रमाणे स्वच्छंद उडायचंय , तिला  उडू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

जन्म तिचा एक सोहळा आहे , तो साजरा करूया
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

No comments:

Post a Comment