Saturday 1 August 2015

हमझा

हमझा
              बघता बघता पहिलं वर्ष कधी संपलं ते समजलं देखील नव्हतं. एका वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात आलो होतो,केमिकल इंजिनियरिंग करायला.आता कुठे खरा प्रवास सुरु झाला होता. दुसरं वर्ष…अन तो पहिला दिवस होता. एक-दोघे सोडली तर मला कोणी ओळखीचं नव्हतं. सारं  काही नव्यानेच तर सुरु झालं  होतं. मी बरोबर ८:४५ च्या सुमारास वर्गात गेलो. बरीच मुलं आलेली होती कारण सर्व जण उत्सुक होते केमिकल चा 'क' शिकायला. मी थांबून कुठे जागा आहे का ते पाहिलं. सापडली… मी थोडासा जोरातच गेलो, तो बाजूला बसलेला होता. अजून तरी नाव नव्हतं  विचारलं. पहिल्या तासानंतर मग ओळख केली. ते नाव तसं  पहिल्यांदाच ऐकलं  मी "हमझा" मस्त वाटलं.
             दुसर्या दिवशी जेव्हा मी क्लास मध्ये गेलो तर रिकामी जागा शोधण्याऐवजी मी हमाझाची सफेद अन त्यावर जरीच्या ताराची नक्षी असलेली टोपी शोधली. अन बेंचवर बसताना हलकेच हसून विचारले "जल्दी आ गये भाई तुम आज?"उत्तरात मला एक स्मित मिळालं,जे आजही डोळ्यासमोरच आहे. अन मग एकाच सोबत असल्यामुळे आमचं बोलणं अजूनच वाढलं. जेव्हा कोणी अनोळखी असतं तेव्हा संवादाचा सु-संवाद व्हायला काही वेळ तर लागतो ना, तोच तो. नंतर मग प्रणव अन अजय पण आम्हाला सामील झाले. छान चतुर चौकडी बनली होती आमची. पुढे मग कुणाल सुद्धा. हसत खेळत अन आदल्या रात्री अभ्यास करत आमचं दुसरं वर्षपण वार्यासारखं भुर्रकन उडून गेलं.
              तिसरं वर्ष सुरु झालं, जसा अभ्यास वाढणार होता ,तशी आमची मैत्री सुद्धा घनिष्ठ होत गेली. पुढे अजून एक हिर्यासर्खा मित्र गवसला-सागर. सर्वच्या सर्व मदतीला धावून येणारे ,मला मित्र ह्या शब्दाचा खरा अर्थ त्यांच्यासोबत असताना उमगतो तिसर्या वर्षाच्या शेवटी आम्हाला ट्रेनिंग करायची होती. मग सर्व जण सोबत जाणे साहजिकच होते. अभिषेक अन अनिकेत देखील सामील झाले. खूप धमाल अन मस्ती केली. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ट्रीप झाली होती ती ("फिरस्ती" हा माझा मागचा लेख त्यावरच होता.)
              आम्हाला हमाझाचे 'रोजे' तसे नवे नव्हते. परामात्म्यापरी अपरंपार श्रद्धा अन कुठल्याही कामात स्वता:ला झोकून कस द्यायचं, हे हमाझाकडून शिकण्यासारखे गुण. मागे एकदा धर्मगुरुंचा कुठलासा कार्यक्रम आल्यामुळे त्याने एक पेपरच बुडवला. पण ह्या पठ्ठ्याने, पुढच्या परीक्षेत, झालेलं  खड्ड शिताफीने बुजलं.अन त्याच्या भाषेतली "थोडे बहोत "गुण आणलेत. आमच्यासाठी ते नक्कीच जास्त होत.
                ईद नुकतीच मागे गेली होती तेव्हा मग हमाझाने 'बिर्याणी अन शिरखुर्म्याचा' प्रस्ताव मांडला. एक दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही सर्व सातही जण  हमझाच्या घरी गेलो. मी आत्तापर्यंत अनुभवलेल्या पैकी हा एक उत्तम पाहुणचार होता. त्याचे जीजू दिदि अन मम्मी मोठ्या प्रेमळ मनाने सारं  काही करत होते. (हमाझाचे वडील कुवैतला असतात , कामानिमीत्त. )थोड्या गप्पा झाल्यानंतर पंगत लगेच बसली.बिर्याणीचा सुगंध दरवळतच  होता  जणू वासानेच पोट भरावं इतका.
             महत्त्वाचं  म्हणजे कुणाल अन प्रणव बिर्याणी खात नसत, त्या दोघांसाठी  खास बनवण्यात  आलं होतं.सोबत असलेल्या शीरखुर्म्याची चव काही औरच होती. काजू बदाम पिस्ता चारोळी  अन त्यावरून त्याच्या  मम्मीच्या मायेचा  शिडकावा ती लज्जतदार चव अजून वाढवत होता. मन तृप्त कसे होते ,ते त्यादिवशी जाणवले . जीवनाच्या वाटेवर मला अजून खूप लोकं भेटतील ,त्यातील काही जवळची देखील होतील, पण आत्ता या वळणावर भेटलेला हमझा याआधीही नव्हता भेटला अन यापुढेही त्यासम कोणी भेटणार नाही, त्या संध्याकाळी खाल्लेल्या बिर्याणीची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळतेय.