Tuesday 8 March 2016

महिला 'दीन ' मुळीच नव्हे ...

                आधीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल अन मुल ह्याच दोन गोष्टी सांभाळण्याची मुभा होती. पण आता काळ बदलालाय अन काळाच्या ओघात स्त्रियांचे महत्त्व देखील. हरेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केलीये. अन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. जी कामे फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे असे बोलले जायचे ती कामेही मोठ्या मेहनतीने भारतीय महिला पार पाडत आहेत.

                 उदाहरणाच द्यायचे म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर अवकाशात देखील भारतीय महिलांनी झेंडा रोवलाय. कल्पना चावला अन सुनीता विल्यम्स या दोघींनी मैलाचा दगड (खरे तर मैलाचं  अवकाश ! ) पार केला . कल्पनाने समोर आलेल्या असंख्य अडचणी पार करून अवकाश भरारी घेतली. महाराष्ट्रात कविता राउत  नाव आता सर्वांनाच परिचित आहे. 'सावरपाडा एक्सप्रेस ' नावाने ओळखली जाणारी कविता  लग्नानंतरही विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालते. चूल अन मुल यापलिकडे सर्वसामान्य भारतीय महिला जिद्दीच्या जोरावर खूप काही साध्य करू शकते याचाच  तिने  दाखला दिला. कविता प्रमाणेच मेरी कोमने सुद्धा अशीच बिकट परिस्थितीवर मात केली.

                   या सार्या घटनांचा पाया घातला  तो  सावित्रीबाई यांनी. स्त्री शिक्षणाची  गंगा  भागीरथी  यत्नाने भारतीय समाजात पोहोचती केली. आज भारतीय महिलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठमोठी शिखरे सर केली. मी राहत असलेल्या ठिकाणीच बाजूला एक छोटेखानी कारखाना आहे (   जेथे सारे कामं 'लेथ मशीन 'वर केली जातात ). काही दिवसानंतर मला समजले कि तेथे एकही पुरुष कामगार नाही. सुरुवातीला विश्वास नव्हता ,पण आत भेट दिल्यावर पाहिलं तर सर्व महिला !!. नकळतपणे मनात अभिमान दाटून आला. त्या सर्व आज स्वावलंबी जीवन जगतायेत.

                   खरोखरच जिद्दीने आयुष्याशी लढणार्या भारतीय महिलांना मानाचा त्रिवार मुजरा !!!


अंधारात स्वराज्याचा दिवा लावी
तू शिवबाची शक्ती , मा जिजाई
क्रांतीसुर्यास अखंड साथ देई
तू समाजास शिकवणारी सावित्रीबाई

मुलास पाठीशी लावून लढणारी आई
तू रणरागिणी झाशीची , राणी लक्ष्मीबाई
जात्यावर बसून रचल्यास ओवी
तू खानदेशाची बहिणाबाई

सावित्रीच्या लेकी शिकल्या
तिच्या वचनाला सार्या जागल्या
स्वताच्या पायी उभ्या राहिल्या
'चूल -मुल ' सांभाळून कमावू लागल्या

पवित्र अशी भारत 'भू' ची माती
यातूनच घडल्या सार्या नवज्योती
कल्पना , सुनीता अवकाशी जाती
'सावरपाडा  एक्सप्रेस ' -कविता धावती

२१ वे शतक , यांत्रिक युग आले
'फक्त चूल अन मुल 'आता  जमा झाले
सर्वच क्षेत्रे पादांक्रांत केले
भारतीय महिला -पुरुषास खांदा लावून चाले 

3 comments: