Tuesday 30 June 2020

विठू माऊली


            आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चैतन्याचे वातावरण आहे , जरी दर वर्षीप्रमाणे पायी वारी जात नाहीये . कालपासूनच सर्वांच्या व्हाट्सएप स्टेटसला लालपरी झळकत आहे जी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन जात आहे . पंढरपूरची  वारी हा तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे . परदेशी संशोधक सुद्धा वारीचा अभ्यास करून गेले . मोठमोठे प्रबंध लिहिले गेलेत वारीवर . वारीतील शिस्तबद्धता , त्यातील नियोजन हे सारं नक्कीच आश्चर्यकारक आहे . 

             मात्र आज मी ज्या विठू माऊली बद्दल लिहितोय ती घरातील  आहे . माझे आजोबा , आईचे वडील कै . विठ्ठलराव माधवराव  पवार . आज ते ह्या ( स्वार्थी ) जगात हयात नाहीत . पण त्यांनी दिलेली शिकवण , त्यांच्या  आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. तसं त्यांचं अन वारीचं खूप घट्ट नातं होतं . ऐन तारुण्यात त्यांनी पंढरपूरची वारीची परंपरा सुरु केली होती . ती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जपली . जवळजवळ 45 वर्षे त्यांनी नित्यनेमाने वारी केली . अन मी स्वतःला तितका  भाग्यवान समजतो  कि मला त्यांचा सहवास लाभला होता . मी पंढरपूरला क्वचितच एकदा गेलेलो , ते सुद्धा सहल म्हणून . पण मला त्याचं कधी दुःख वाटलं नाही . कारण मी जिवंत विठू माऊली चे दर्शन घेत होतो माझ्या आजोबांच्या रूपात . 
             
            त्यांचं संपूर्ण आयुष्यच एक आदर्श होतं . लोकसेवेला  वाहून दिलेलं . साधारण 80 च्या दशकापासून ते गावचे सरपंच म्हणून 15 वर्षे बिनविरोध निवडून आले होते इतकी त्यांची लोकप्रियता होती . गावातील मुलांना शाळेसाठी दुसऱ्या गावात जावं लागायचं , त्यांनी ती अडचण बघून गावात शाळा देखील उघडली त्यांच्या वडिलांच्या नावाने . घरातील मोठा मुलगा  म्हणून त्यांनीच सर्वांचं पाहिलं . पण मोठे  असल्याचा कधी काडीमात्र  गर्व केला नाही . एकत्रित  कुटुंबाचा संसाराचा गाडा ओढताना किंवा संपूर्ण गावचा कारभार सांभाळताना त्यांनी रोजचा हरिपाठ कधी चुकवला नाही . त्यांच्या पांडुरंगाच्या भक्तीत श्रद्धा होती , अंधश्रद्धा मात्र कधी दिसली नाही . विज्ञानाची कास धरूनच ते चालत . ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज , सावता माळी ह्या संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणेच त्यांनी आधी स्वतःच्या कामात , शेतीत पांडुरंग पाहिला  . वर्षभर अविरत न थकता ते  काम करायचे अन मग आषाढी -कार्तिकी एकादशीला वारी करून विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे . 

             वयाच्या साठीत  सुद्धा वारी करून ते आल्यावर  आम्ही त्यांना भेटायला जायचो ,त्यांच्या  चेहऱ्यावर  प्रचंड उत्साह ओसंडून वाहायचा . वारी करून आल्याचा त्यांचा थकवा आम्हाला तिळमात्र जाणवत नसायचा . खरे तर शाळेत सर्वच गोष्टी कधीच शिकवल्या जाऊ शकत नाहीत . संस्कारांचे मोती हे घरातूनच एका पिढी मार्फत दुसऱ्या पिढीला दिले जातात . आजही आजोबांनी आम्हाला दिलेली शिकवण हि आयुष्य जगण्यात कामी  येतेय . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर वर्षी गावावरून जाणाऱ्या दिंडीला अन्नदान केले जाते . मला त्यांच्यावर लिहिण्यासाठी एक  पुस्तक कमी पडावे असे त्यांचे आयुष्य होते , इतरांसाठी वाहिलेले . चंदनासारखे स्वतः झिजून इतरांना सुगंधित करणारे . 

           आज त्यांच्यावर थोडक्यात लिहिण्याचा एकच उद्देश होता , जसं  मला माझ्या आजोबांमध्ये विठू माऊली  दिसली , तसेच आपल्या इतरांच्या आयुष्यात देखील  अशाच विठू माऊली आहेत . त्या सर्वांच्याच घरात असतात खासकरून आजी-आजोबांच्या रूपात . तर त्यांना आपण जपलं पाहिजे , त्यांचा आयुष्य जगण्याचा अनुभव दांडगा आहे आणि तोच अनुभव आपल्याला आयुष्याची शिदोरी म्हणून वापरायचा आहे .

          साधं उदाहरण आहे , लॉकडाउन मुळे घरात बसून सर्वच जण कंटाळलेले असणार , तेच तेच सिनेमे , सिरीयल पुनः प्रसारित बघून . पण ज्यांच्या घरात आजही आजी-आजोबा आहेत त्यांना मात्र हे कधीच कंटाळवाणं वाटलं नसणार . एकत्र कुटुंब असलेल्याना त्याचा  चांगला अनुभव येतो . 

            कोरोनामुळे देवळातील माऊली  भेटली नाही म्हणून काय होतं  , घरातील माऊली चा आशीर्वाद घ्या , त्यांना प्रेम द्या  . 'तो' नक्कीच  कंबरेवर हात ठेवून बघतोय तुमच्याकडे !

Sunday 14 June 2020

विसंवादाचा विपर्यास

             अशा खूप कमी घटना आहेत ज्यांनी मला रात्र-रात्रभर जागं ठेवलंय . कालची रात्र देखील त्यातलीच एक होती . डोळ्याला डोळा लागतच नव्हता . निसर्ग वादळ कधीच येऊन गेलं देखील , पण डोक्यात  रात्रभर विचारांचे वादळे चालूच . न राहवून लिहायला घेतलं , अन भराभरा ओतून मोकळं केल्यागत ठेवलं. विचार केला , मी जसं लिहून  होतो , मनातील भाव मोकळे करतो . चित्रकार कुंचल्यातून व्यक्त  होऊन भाव मोकळे करतो . गायक कंठातून गावून व्यक्त होऊन भाव मोकळे करतो . प्रत्येकाच्या छंदा / आवडीनुसार व्यक्त होणे वेगळे , व्यक्त होण्याचे  माध्यम देखील वेगळे .पण त्याही  पलीकडे विचार येतो , सर्वांना हे खरंच शक्य होते का ? व्यक्त होणे , दुसऱ्याला आपलं मन मोकळं करून दाखवणे ? 

               माणसाने आज चंद्रावर , मंगळावर याने पाठवलीत , दुसर्या आकाशगंगेत याने गेलीत , त्यांची छायाचित्रे घेणे शक्य झाले .  पृथ्वी बाहेरील अथांग जग देखील पालथं घालण्याचा प्रयत्न चालू आहे . हे   सर्व  बाह्य जगत झालं . पण स्वतःच्या मनात किती खोलवर जाऊ शकला माणूस ? त्याचा थांग लागला कोणाला आजवर ?? बघायला गेलं तर किती छोटीशी गोष्ट आहे मन. अगदीच खोलात मलाही जाणे शक्य नाही . पण इंटरनेट च्या महाजालात जे माहिती स्रोत म्हणून सर्वमान्य आहे - विकिपीडिया , त्यावर जाऊन थोडी माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला . पहिल्याच वाक्याला त्यांनी एक टीप दिलीये - 'या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी अतिरिक्त उध्द्वरणांची आवशक्यता आहे'. (This article needs additional citations for verification). म्हणजे त्यावर जे लिखाण झालंय , त्याबद्दल अजूनही पूर्णत्त्व प्राप्त झालेलं नाही . 
ते ज्या शक्यते पर्यंत पोहोचले ते खालीलप्रमाणे आहेत . 
१. मन आणि मेंदू हे दोन्हीही वेगळे आहेत (Dualism) . 
२. मानसिक घटना आणि मेंदूतील घडणाऱ्या गोष्टी ह्या सारख्याच आहेत (Materialism) . 
३. फक्त मानसिक घटनाच अस्तित्त्वात आहेत (Idealism). 

               मेंदू हा एक शरीराचा भाग / अवयव आहे , तर मन केवळ असंख्य विचारांचे भांडे म्हणू शकतो . थोडक्यात मन हे एक असे क्षेत्र आहे , ज्यात स्वतःशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही . वरील गोष्टी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे , कि तुम्ही बाहेरून ओळखू नाही शकत , समोरील  व्यक्तीच्या मनात काय चाललंय . पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाला एक गोष्ट जास्त अवगत आहे . ती म्हणजे विचार करण्याची . प्राण्यांना फक्त मेंदू आहे ते विचार नाही करू शकत . माणसाला आसपासच्या घटना काय आहेत त्यावर विचार करता येतो , वैज्ञानीक तर्क नाहीये ह्या गोष्टीला पण माणसाला हे अवगत आहे . ( खरेतर मन अगदी कुठे आहे हेच ठामपणे अजून कळलेलं नाहीये माणसाला ). हि झाली मनाची शास्त्रीय गोष्ट . आता खऱ्या गोष्टीकडे वळूयात . जर कोणी सांगायला असमर्थ आहे , त्याच्या मनात काय चाललंय , व्यक्त होऊ शकत नाही . किंवा व्यक्त झाल्यावर लोकं मला काय म्हणतील ? , माझ्या बद्दल काय विचार करतील ? , मला अयशस्वी ठरवतील का ? मी चुकलो का ? ह्यासारख्याच असंख्य विचारांचे काहूर माजत असल्यामुळे कदाचित व्यक्त होणे अवघड होऊन बसले आहे . पण हे सर्व बदलण्याची खरंच गरज आहे . 

ह्याला दोन्ही बाजू आहेत . 
१. एक तर सर्व मनात साचवून ठेवलं तर त्याचा उद्रेक होऊन आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलले जाऊ शकते . आधी सुद्धा एका लेखात म्हटले आहेच मी. आत्महत्या हा उपाय कधीच नव्हता , नाहीये आणि नसेलही . तुमच्या जाण्याने जगाला काडीमात्र फरक पडणार नसतो , पण तुम्ही ज्यांच्यासाठी जग आहात त्यांना मात्र फार फरक पडतो तुमच्या जाण्याने . 
२. पण खरंच त्याच्याही पलीकडे विचार केला असता असे जाणवते , का कोणी इतका टोकाच्या भूमिकेला जावं ? त्याला जे मानसिक समाधान /मन : शांती हवीये ती खरच मिळतेय का ? अर्थात ह्या सर्वांचा भौतिक सुखासोबत संबंध जोडणे देखील योग्य नाही . ज्यांचं जगात नाव झालाय , प्रसिद्धी आहे , पैसा आहे ती व्यक्तीदेखील असे पाऊल  उचलताय . हि खरोखरीच  धोक्याची घंटा आहे मानवासाठी . 

                समोरच्या माणसाचं असणं महत्त्वाचं आहे ना कि त्याच्या समस्या , ज्यामुळे तो मानसिक त्रासात आहे . आज माणसामध्ये असलेला विसंवाद ह्याला काही अंशी कारणीभूत आहे . त्यावर काम करणे गरजेचे आहे . स्वतःचा अहंकार समोरच्या व्यक्तीपेक्षा मोठा कधीच नसावा . आभासी जगात , सोशल मीडियावर तुमचे लाखो - करोडो मित्र /फॉलोवर्स असतील , पण तुमच्यासोबत तुमचं ऐकणारा आपला व्यक्ती नसेल तर तुमचं आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती दोघांचंही चुकतंय . दोघांनी स्वतःच्या भूमिका नीटपणे निभावल्या पाहिजेत . स्वतः कधी टोकाचा विचार करायचा नाही , आणि दुसरा करतोय किंवा एकटा पडतोय , तर त्याला अजून दूर ढकलणे योग्य नाही . कारण व्यक्ती निघून गेल्यावरच जास्त आठवणी काढल्या जातात . मग जिवंत असतानाच का काळजी घेतली जात नाही ? समोरच्या व्यक्तीसोबतचा संवाद तुमच्यासाठी नसेलही तितकासा महत्त्वाचा , पण समोरील व्यक्तीसाठी नक्कीच आहे . ज्या क्षणाला समोरच्याचे बोलणे हे तुम्हाला रडगाणे वाटू लागते , तो हाच क्षण असतो का , जेव्हा तुम्ही समोरचा माणूस आणि त्याच्यासोबतचं नातं दोन्ही गमावता ? व्यक्ती आणि नातं गमावल्यानंतर रडगाणे करण्यापेक्षा त्याचे रडगाणे ऐकून घेणं कधीही योग्यच नाही का ?

              काल झालेल्या घटनेमुळे पुढील काही दिवस खूप सारे मानसोपचार तज्ञ्  जन्म घेतील . आपल्याला त्यात देखील जाऊन काही जटिल (Complex) करायचं  नाही . साधं , सरळ अन सोप्प , आपल्या माणसांची काळजी घ्या त्यांच्याशी व्यक्त व्हा , त्यांना सुद्धा बोलते करा. कदाचित उद्या तुम्ही देखील आजूबाजूला माणसांची गर्दी असून एकटे व्हाल .

विसंवादाचा विपर्यास करू नका ! सुसंवाद ठेवा !!