Saturday 26 August 2017

हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा

              दर वर्षीप्रमाणे ह्या  वर्षीसुद्धा अगदी काठावर  सुट्टी मिळाली  , गणेश चतुर्थी साठी .  १७-१८   तासांच्या  प्रवासा नंतर घरी पोहोचलो . आल्यावर लगेचच घरातल्या गणेश मूर्तीची  प्रतिष्ठापना केली . मंडळाच्या गणपतीची तयारी बघायला निघालो तर समजलं कि ह्यावेळीचा गणेशोत्सव  थोडा  वेगळा आहे . अध्यक्षांपासून  खजिनदारापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने लीलया पेललीये . अगदी वर्गणी गोळा करण्यापासून सर्वच महिलांनी हिरीरीने भाग घेतला . देणगी  देणार्याला पण विश्वास होताच कि दिलेली देणगी सत्कारणी लागणार म्हणून . एरवी  घरातलं बजेट काटेकोरपणे सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया हेदेखील बजेट  सांभाळू शकतात यात तिळमात्र शंका नाही . 

            मी अगदी लहान  असल्यापासून बघत आलोय , मूर्तीची प्रतिष्ठापना असो  किंवा इतर कामे  आदी सर्व गोष्टी पुरुष मंडळी , तरुण मुले बघत असत . किंबहुना  तथाकथित पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वत्र हेच बघावयास मिळते . साहजिकच सर्व बाबतीत त्यात पुरुषांचा उजवेपणा दिसू लागतो किंवा अहम दिसतो . 
कर्कश आवाजात गाणी वाजवणे हा त्यातलाच एक प्रकार . काळाच्या ओघात सुमधुर गणपतीची गाणी , आरत्या बाजूला सारून तिथे "मुन्नी बदनाम" होत असते. वाटतच नाही गणपती बसलेत कि 'कार्य(न )कर्ते '  पार्टी करायला बसलेत .

            स्वखुशीने , यथाशक्ती वर्गणी जमा करण्याचे दिवस आता मागे पडलेत . २० - २५ कार्य(न)कर्त्यांची  'गॅंग ' घरात घुसून अपेक्षित असलेली रक्कम भेटल्याशिवाय  न सोडणारी . मूर्ती , इतर शोभीकरण , देखावे  करून उरलेले  वर्गणीचे पैसे स्टेज खालीच बसून पत्ते  खेळणे  अन तत्सम कारणांसाठी  उडवले जातात . ह्या गोष्टींची इतरांना देखील कुणकुण असते पण त्यावर भाष्य करण्यास  तयार  नसतं . कारण  मंडळ राजकीय पक्षांच्या कुठल्यातरी भाऊ - दादा - आबांच्या अखत्यारीत असतं . अन गणपतीपेक्षाही त्यांचाच 'वरदहस्त ' जास्त मोठा असतो . 

           लोकमान्य टिळकांनी ह्यासाठी  कधीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु  केला नव्हता . त्यांचा उद्देश  लोकांनी एकत्र यावे , बाहेर पडून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देणे हा होता . आज त्याच्या वास्तवाने वेगळेच रूप धारण केले आहे . युद्ध आज देखील संपले नाहीये , भ्रष्टचारा विरुद्ध अन प्रत्यक्ष गणेशाच्याच नावाखाली चाललेलं . कुठेतरी , कधीतरी हे थांबायलाच हवं ना ?

           आज भारतातील 'स्त्री ' जर राष्ट्रपती बनून देश बघते , एक स्त्री बुलेट ट्रेन चालवते , मग गणपती मंडळ का नाही ? एक संधी तर देऊन बघा , बदल आपोआप जाणवेल कारण हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा आहे   . दुसऱ्याकडे बघण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा . स्वतः टिळकांनी देखील ' आधी केले मग सांगितले ' .  

No comments:

Post a Comment